केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केलं जाईल असं जाहीर केलं असून महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. राज्य पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट केलं होतं. पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावरुन नाराजी जाहीर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मोफत लसीकरणाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

“मोफत लसीकरणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. सोनिया गांधी यांनी तसं सांगितलं असून लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह धरला असून मान्य होईल अशी आशा आहे. मुख्यमंत्री यावर विचार करत असताना श्रेय घेण्यासाटी कोणी जाहीर करतं हे आम्हाला आवडलं नाही, काँग्रेस म्हणून आमची नाराजी आहे,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

“बोलघेवडे, कांगावाखोर…,” फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका

“लस उपलब्ध होणं आणि त्यासाठी जास्त केंद्रं उभारणं यासंबंधी धोरण आखावंच लागले. ४५ च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणावेळी गर्दी होत असताना १८ च्या पुढील सर्वांना लस देताना गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंधळ होऊन करोना प्रसार वाढेल. लस उपलब्ध करून देणं केंद्राची जबाबदारी असून दोन दिवसात धोरण निश्चित केलं जाईल,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

फडणवीसांची टीका
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचं असल्यास बाजारात लस उपलब्ध आहेत. परंतू १०० टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत. ट्विट डिलीट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे,” असं सांगत फडणवीसांना राज्य सरकारवर निशाणा साधला.

मोफत लसीकरणावरून मंत्र्यांमध्ये चढाओढ

संजय राऊतांची प्रतिक्रिया
“हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

नेमकं काय झालं – 
केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा के ली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यातील लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही तासांतच मोफत लस देण्याचा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी जाहिर केले आहे.

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट मागे घेत लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.