भाजपा कंगनाचा बोलविता धनी असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे असं ट्विट त्यांनी केलं आहे. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” असून कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे”.

आणखी वाचा- माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं सहन करणार नाही, कंगनाला मनसेची तंबी

“महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

आणखी वाचा- धनंजय मुंडे म्हणतात, “कंगना कृतघ्न वागण्यामागे दोन कारणं असू शकतात, एक तर…”

“विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- …कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना आमदाराचा इशारा

कंगनाने काय म्हटलं आहे?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. या आधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”.