गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्लीमधील पेदी – कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितलं. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल असं ते म्हणाले.

कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बेठक सुरू होती अशी माहिती आहे. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.