विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावरू आज भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.

सभागृहात गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन

विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलाताना फडणवीस म्हणाले की, ”आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती. ती शंका सरकारने खरी केली आहे.आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडल आणि हे सरकार अपयशी ठरलं हे आम्ही दाखवून दिल्यामुळे, सरकारने आमच्या आमदारांवर खोटे आरोप लावून १२ आमदरांना निलंबित केलेलं आहे.”

“वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…”; फडणवीसांनी तडकाफडकी सोडलं सभागृह

तसेच, ”मी पहिल्यांदा तर हे सांगू इच्छितो, ओबीसी आरक्षणासाठी १२ काय पूर्ण १०६ आमदारांना निलंबित केलं तरी आम्ही, संघर्ष करतच राहू. भाजपा जोपर्यंत ओबीसींचं आरक्षण परत येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहील. एक वर्ष नाही पाचही वर्ष आमचं या ठिकाणी सदस्यपद रद्द झालं. तरी आम्ही त्याची परवा करत नाही. आज सभागृहात जे पाहिलं, अनेक वेळा लोक यापूर्वी मंचावर चढले, कधीही कुणाला निलंबित करण्यात आलं नाही. नेहमीच अध्यक्षांच्या दालनात बाचाबाची होते. पण कधीही कुणी निलंबित होत नाही. परंतु स्पष्टपणे सांगतो, माझ्यावर कुणी हक्कभंग आणला तरी मला परवा नाही. मी स्पष्टपणे सांगतो, स्टोरी तयार करण्यात आली, एकाही भाजपाच्या सदस्याने शिवी दिलेली नाही आणि कुणी शिवी दिली, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. शिवी देणारे तिथे कोण होते. मला ती शिवी देता येत नाही पण सगळ्यांनी बघितलं आहे आणि अशा परिस्थितीत शिवेसेनेचे सदस्य तिथे येऊन, त्यांनी धक्काबुक्की केली. त्याच्यावर भाजपाचे काही सदस्य आक्रमक झाले पण, तेही आम्ही होऊ दिलं नाही त्यांना आम्ही बाजूला केलं आणि जे काही थोडी धक्काबुक्की झाली त्या संदर्भात आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांना सांगितलं की सर्वांच्यावतीने मी तुमची क्षमा मागतो आणि तो विषय संपला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आशिष शेलार, गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली व तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. त्यानंतर या सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमचे आमदार निलंबित करण्यासाठी ही स्टोरी तयार केली. कारण, ओबीसी संदर्भातही हे सरकार अपयशी ठरलं आहे आणि मराठा आरक्षणा संदर्भातही हे आरक्षण अपयशी ठरलेलं आहे.” असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.