राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरसह वरळीच्या घरावर अंमलबजावणी संचालनायलयाने (ईडी) आज (शुक्रवार) छापा टाकत झाडाझडती सुरू केली आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. दरम्यान, या कारवाईबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी ही सगळी चौकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे, याचा कुठलाही राजकीय अन्वायार्थ काढण्याचं कारण नाही. असं म्हटलं आहे.

“मुंबई उच्च न्यायालयाने एक आदेश देऊन या संदर्भातील सगळी चौकशी सीबीआला सोपवलेली आहे. त्यामुळे ही सगळी चौकशी उच्च न्यायालयाने निर्देशीत केल्याप्रमाणे सुरू आहे. याचा कुठलाही राजकीय अन्वायार्थ काढण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की जी काही जबाबादरी उच्च न्यायालयाने सोपवली आहे. त्यानुसार यंत्रणा काम करत आहेत, त्यामुळे यापेक्षा अधिक त्यावर बोलण्याचं कारण नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे.

“यंत्रणेचा गैरवापर हे त्यांचं ‘स्टाईल ऑफ ऑपरेशन’ दिसत आहे”; सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा!

अनिल देशमुखांच्या घराबाहेर मोठयाप्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली असल्याबद्दल विचारण्यात आल्यावर फडणवीसांनी सांगितलं की, साधारणपणे सीबीआय जेव्हा एखादी रेड करते, त्यावेळी स्थानिक पोलिसांच्या ऐवजी सीआरपीएफ त्यांच्यासोबत असते, अशाप्रकारचा त्यांचा प्रोटोकॉल आहे.

“विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर सुरू ; मोदी सरकारचा डाव महाविकासआघाडीने हाणून पाडावा”

तर, “लोकशाही वाचवण्यासाठी मविआ सरकारला बदनाम करण्याचा मोदी सरकारचा डाव तीनही पक्षांनी हाणून पाडला पाहिजे. विरोधकांचा छळ करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आरोपकर्ते आर्थिक देवाण-घेवाण झाली नाही असे म्हणत असतानाही अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या इडीने उत्तर द्यावे.” असा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.