करोनाच्या संकटात राज्यामध्ये विद्यापीठांच्या परीक्षेवरून गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी परीक्षांसंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर विरोधकांकडून बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.

राज्यात बी.ए, बी.एस्सी व बी. कॉम या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. त्याचबरोबर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही घेतली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १९ जून रोजी केली होती. त्यानंतर विरोधकांकडून बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- MHT CET 2020 : उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुढे ढकलल्या

“व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयोग करताहेत. माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे,” असं आवाहन उदय सामंत यांनी केलं आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून राज्यात राजकारण सुरू आहे. करोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोध दर्शवला होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार निर्णय होईल, असं राज्यपालांनी सरकारला कळवलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं बी.ए, बी.एस्सी व बी. कॉम या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.