राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तीकर विभागाने नोटीस पाठवली आहे. शरद पवारांकडून निवडणूक पत्राबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. शरद पवार यांनीच पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्याबद्दल प्रेमाची भावना जी दिसत आहे त्याबद्दल आनंद आहे असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.

“नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असं कळलं, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचं उत्तर लवकरच मी देईन,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. “राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केलं असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- मी आज दिवसभर अन्नत्याग करणार – शरद पवार

शरद पवारांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर तसंच कृषी विधेयकं संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. “सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

आणखी वाचा- Sushant Singh: ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रेटींची नावं; शरद पवार म्हणतात…

“हे नियमाविरोधात असल्याचं काही जण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आलं. तेदेखील आवाजी मतदानाने. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्ंनांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणं अशी माझी अपेक्षा होती,” असं शरद पवार यांनी सांगितलं.