अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे तपासावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, त्या प्रकरणामुळे बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरुद्ध आरोप करणाऱ्या पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर रिया चक्रवर्तीवर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओचा हवाला देत निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलाताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं होतं. त्यावरून पांडे यांच्यावर टीका होत असून, जितेंद्र आव्हाड यांनीही निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्रानं पाहिली”

जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर “नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील,” अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे.

आणखी वाचा- सुशांत प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत, नितेश राणेंचा गंभीर आरोप

सुशांत सिंहनं आत्महत्या केल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच बिहार सरकारनं सीबीआय तपासाची शिफारस केली होती. त्यावर केंद्रानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारनं विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे दिलं आहे.