राज्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. करोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे सरकारने अद्यापही सर्व निर्बंध शिथिल केलेले नाहीत. दुसऱ्या लाटेतून धडा घेतल्याने सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ करोना रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.९९ टक्के इतकं आहे. तर आज ६ हजार ७२७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात आज १०१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईतही करोना रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात ७१४ रुग्णांनी करोनावर मात केली. तर एका दिवसात ६०८ नव्या रुग्णांची नोंद झालीआहे. मुंबईत एकूण ६ लाख ९४ हजार ७९६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८ हजार ४५३ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. तर २१ जून ते २७ जून दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता.

देशात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी देशात ४६ हजार नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात आणखी एक मोठा दिलासा म्हणजे करोनामुळे होत असल्येल्या मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. करोनाची दुसरी लाटे शिगेवर पोहोचल्यानंतर देशात दररोज साडेतीन हजार ते साडेचार हजार या सरासरीने मृतांची नोंद झाली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृतांचा आकडा वाढण्यास सुरूवात झाली होती. तीन महिन्यांनंतर मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील करोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक महत्त्वाची बाब म्हणजे देशात दररोज होत असलेल्या करोना रुग्णांच्या मृ्त्यूंचा आकडाही घटला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.