राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना वाचन वाढवण्याचा सल्ला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हा सल्ला दिलाय.

“राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. “या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

“छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे,” असा उपरोधिक टोला लगावतानाच “राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे,” असं मलिक म्हणाले आहेत. तसेच राज ठाकरेंनी वाचन वाढावे असा खोचक टोलाही मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना लगावलाय.

राज काय म्हणाले?

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

“ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचं का आपण? पूर्वी फक्त नावं विचारल्यानंतर तुम्ही कुणापैकी असं विचारायचे. म्हणजे तुझी जात कोणती? पण हे फक्त तिथपर्यंतच होतं. पण आता अगदी शाळेपर्यंत हे उतरलंय.”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.