सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.
“मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि लढावं. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावलं उचलावीत अशी विनंती आहे,” असं पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे.
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”.
The flame that Vivek has ignited in our minds can set the whole system ablaze. The future of an entire generation is at stake. I have no choice but to approach the Hon’ble Supreme Court and file an intervenor application in the Maratha reservation matter pending before it.
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
“मराठा आंदोलनाची धगधगती मशाल ह्रदयात ठेवून विवेक तसंच इतर अनेक लाखो तरुणांसाठी न्यायाची मागणी करण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र,” असंही ते म्हणाले आहेत.
I am ready to carry the burning torch of Maratha agitation in my heart and knock the doors of justice for Vivek and millions of other helpless ‘Viveks’.
Jai Hind. Jai Maharashtra.— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक असं या तरुणाचं नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.