राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांना काही आक्षेप होते, पण काम रेटून नेण्याचा‌ प्रयत्न केला अशी टीका शरद पवारांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी अपील लवकर करण्याची गरज असल्याने मला दिल्लीत जाता आलं नाही असं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

सदस्यांनी अन्नत्याग केला असून मीदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं,” अशी टीका शरद पवार यांनी केली.

आणखी वाचा- मी आज दिवसभर अन्नत्याग करणार – शरद पवार

“हे नियमाविरोधात असल्याचं काही जण सभापतींना सांगत होते. सदस्यांनी वेलमध्ये धाव घेतली, नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला. नियमाचा आधार सदस्य घेत असतील तर किमान ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपसभापतींकडून होती. पण त्याकडे लक्ष न देता मतदान घेण्यात आलं. तेदेखली आवाजी मतदानाने. साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. या सगळ्या प्रश्ंनांकडे गांभीर्याने पाहणे, सदस्यांकडे लक्ष देणं अशी माझी अपेक्षा होती,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- Sushant Singh: ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रेटींची नावं; शरद पवार म्हणतात…

आदर्श विचारांना तिलांजली देण्याचं काम उपसभापतींनी केलं असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. उपसभापतींचं वर्तन सदनाच्या प्रतिष्ठा आणि पदाचं अवमूल्यन करणारी होती असंही ते म्हणाले आहेत. “एकीकडे बाजारपेठ खुली केली, मग कांद्यावर निर्यातबंदी का?,” असा सवाल शरद पवारांनी यावेळी केंद्र सरकारला विचारला. इतक्या घाईत दोन्ही विधेयकं एकत्र संमत करण्याची गरज नव्हती असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं असून केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीका केली.