पंकजा मुंडे यांचा दावा; नाराज कार्यकर्त्यांचे राजीनामे

बीड : राजकारणात व्यवसाय नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायचे असे वाटत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते आणि ते योग्यही होते. पण पक्षाने इतरांना संधी दिली म्हणून आम्ही नाराज आहोत अशा चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. भाजपात नरेंद्र, देवेंद्र टीम असे काही नसते. एका पध्दतीने निर्णय घेतले जातात अशा शब्दांत भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बीड  जिल्ह्यतील भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून येत होत्या. विस्ताराच्या दिवशी खासदार प्रीतम आणि आम्ही मुंबईच्या घरीच आहोत, दिल्लीत असल्याचा बातम्या चुकीच्या आहेत. असे ट्विट केल्यानंतर मंत्रिमंडळ  विस्तारावर मुंडे भगिनींनी मौन बाळगले होते. तर समर्थकांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मंत्रिपदासाठी खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते, ते योग्यही होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सुरुवातीला त्या निवडून आल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा त्या मोठय़ा मताधिक्याने विजयी झाल्या. त्यामुळे त्यांना संधी मिळेल अशी आशा समर्थकांना होती. पण पक्षामध्ये निर्णयाची पध्दत आहे. त्यामुळे पक्षाने इतर नवीन लोकांना संधी दिली. त्यांच्यात नेतृत्व क्षमता असल्याने मंत्रिपद देण्यात आले असावे. त्यामुळे आम्ही नाराज आहोत हे चुकीचे असून आम्ही पक्षावर निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते आहोत. डॉ.भागवत कराड यांनी मध्यरात्री फोन करून आपल्याला दिल्लीतून बोलावणे आले असल्याने जात असल्याचे सांगितले होते. वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठीशी मी उभी राहणार आहे. पायाला फोड आलेले असताना पट्टय़ा बांधून आम्ही प्रचार केला. हे विसरून चालणार नाही असे सांगत दिवंगत मुंडे यांच्या आठवणीने त्या गहिवरल्या. नेता कोणा एका जातीचा नसतो, त्यामुळे मी ओबीसी, मराठा या समाजाच्या प्रश्नांबरोरच वंचितांचेही प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे.

भाजप जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळेंचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा भाजप सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांमार्फत प्रदेश कार्यालयात पाठवला आहे. दोन दिवसांपासून समाज माध्यमातून नाराजी व्यक्त करणाऱ्या मुंडे भगिनी समर्थक आता आक्रमक झाले असून राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला जनाधार मिळवून दिला. संघर्ष करून सत्ता दिली. मात्र विद्यमान पक्ष नेतृत्व त्यांच्याच वारसांना डावलण्याचे काम करत आहे. त्यामुळे पदाचा राजीनामा दिला असून अन्य पदाधिकारीही राजीनामा देणार असल्याचे अ‍ॅड. सर्जेराव तांदळे यांनी सांगितले.