देशभरासह राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांचे मृत्यू देखील सुरू आहेत. याचबरोबर करोना पाठोपाठ आजा डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोकं वर काढलं आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील. असं टोपे म्हणाले आहेत.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितल की, “डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण १०० नमूने घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला २५ नमूने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचं होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचं झालं, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु उर्वरती सर्वजण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चतच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये ८० वर्ष वय, अन्य आजार होते हे देखील कारणीभूत घटक आहेत. डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशभरात ४८ केसेस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील.”

Covid-19: डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का? केंद्राचं स्पष्टीकरण

तसेच, “आरटीपीसीआर ची दररोजची क्षमता ही खऱ्या अर्थाने, पावणेदोन लाख- दोन लाखापर्यंत आहे आणि त्या क्षमतेपर्यंत आपण आपल्या तपासण्या दररोज घेतल्याच पाहिजेत, असं देखील आम्ही आरोग्य विभागावला सूचित केलं आहे. केवळ आरोग्य विभागच नाही तर वैद्यकीय शिक्षण, महापालिकेचा जो भाग असेल त्यांना देखील सूचिक केलं आहे की, तपासण्या अजिबात कमी करता कामा नये. कारण, चाचण्या कमी केल्याने देखील थोड्याफार प्रमाणात दररोजच्या पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संख्येवर परिणाम होत असतो. लोकांनी चाचण्यांसाठी देखील सहभाग घ्यावा. तपासणी, लसीकरण याचं आवाहन नागरिकांना आहे आणि याचबरोबर करोना नियमांचे पालन करून वागणं हा सर्वमान्य मंत्र आहे, त्याचं पालन करावं.” असं आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपेंनी नागरिकांना यावेळी केलं.

“आपण सर्व जिल्ह्यांना आता थर्ड लेव्हलवर आणलं आहे. त्यामुळे आता थर्ड लेव्हलचे निर्बंध लागू आहेत. म्हणून प्रशासनाला आम्ही सूचित केलेलं आहे, की कुठल्याही परिस्थितीत थर्ड लेव्हलची जी काही निर्बंध आहेत, ती पाळली गेली पाहिजेत. त्यामुळे प्रशानसन देखील त्याकडे लक्ष देईल व जनतेने देखील सहकार्य करावं.” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.