ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे २६ जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

“नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्यानंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, अशी वक्तव्ये करतात. मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प आहेत,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

“सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले, तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. आघाडी सरकारचे मंत्री निवडणुका होऊ देणार नाहीत, असं फक्त म्हणत राहिले. आता आम्ही यासाठी २६ जूनला राज्यभर एक हजार ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत. पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार आहेत,” असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले.