बीड :  करोना काळातील कंत्राटी पध्दतीवरील कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी वेळ न दिल्याने संतप्त होऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफाच अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरम्यान, या घटनेवरून आक्रमक होत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कार्यपध्दतीवर टीकास्त्र सोडले. आरोग्यमंत्री केवळ जालना जिल्ह्यपुरतेच आहेत का? त्यांच्या जिल्ह्यला एक आणि इतर जिल्ह्यला एक न्याय कसा, असा प्रश्न उपस्थित करत आमदार धस यांनी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराच दिला.  करोनाच्या काळात सख्खा भाऊ किंवा आई-वडीलही जवळ येत नव्हते. त्यावेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले. अशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक होते. नोकरी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढले हे सरकारच्या अकार्यक्षमतेचेच प्रतीक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कृती समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन उभे करावे. आपण सर्व सहकार्य करू, अशी ग्वाहीही आमदार धस यांनी दिली.

लाठीमारीवरून पंकजा मुंडेही आक्रमक

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही कर्मचाऱ्यांवर लाठीमार करणे हे संतापजनक असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते, अशा शब्दांत तीव्र नाराजीचा सूर काढला. घडलेला सगळा प्रकार संतापजनक असून ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यत उपमुख्यमंत्री आले असताना जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांची भेट घडवून आणण्याचे स्थानिक नेत्याचे काम होते. मागण्या तर पूर्ण होत नाहीत पण किमान भेटायला आणि बोलू द्यायला हवे होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहचू दिले नाही. वेळ मागितला असता तर अजित पवार यांनी दिला असता. त्यामुळे हे स्थानिक लोकप्रतिनिधीचे अपयश असल्याचा टोला अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

लसीकरणात बीडकडे दुर्लक्ष

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत:च्या जालना जिल्ह्यत मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध करून दिली. तर बीएएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना करोनात सेवा देण्याबाबत परवानगी दिली. मग बीडसह इतर जिल्ह्यत का नाही? असा प्रश्?न उपस्थित करत आरोग्यमंत्री राजेश टोपे केवळ एका जिल्ह्यचेच आहेत का? असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला. लसीकरणाबाबतही जालना, पुणे जिल्ह्यत लाखोंच्या संख्येने लसीकरण झाले असताना बीडसह इतर जिल्ह्यत मात्र लसीकरण नाममात्र झाले आहे. बीड जिल्ह्यने तर राष्ट्रवादीला चार आमदार दिले मग असा दुजाभाव का? असा प्रश्?नही धस यांनी केला. तर करोनाच्या काळात कांद्याचे बियाणे दुपटीने महाग झाले आहे.