‘हम दो, हमारे दो’ हा जो नारा आहे…राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. “राहुल गांधींचा जो आरोप आहे. हम दो हमारे दो..या आरोपामध्ये तथ्यता नाही. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत” असे रामदास आठवले म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्याच्या कायद्यात एवढंच आहे की, “शेतकरी आपला माल जिथं जास्त पैसे मिळतील तिथं विकू शकतात. शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा नाही. शेतकरी असल्याने आम्हाला खायला मिळतंय याची आम्हाला कल्पना आहे…! शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कायदा आणलेला आहे. मात्र, गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

आणखी वाचा- जातीच्या आधारावर २०२१ची जनगणना करावी; केंद्रीय मंत्र्याची मागणी

“आरोप प्रत्यारोप चालले आहेतच. सर्व विरोधक एकवटले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरातील शेतकरी कायद्याच्या विरोधात नाहीत. पंजाब, हरियाणा येथील शेतकरी विरोध करत आहेत. मूळ शेतकरी आंदोलनात आलेला नाही” असे रामदास आठवले म्हणाले.