सीताराम चांडे, राहाता संगमनेर तालुक्यातील मनोली गावचे रहिवासी व इंदूर येथील राजा रामण्णा अणुऊ र्जा केंद्रातील चुंबक प्रौद्योगिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रावजी सुखदेव शिंदे यांनी भारतातील पहिल्या चुंबकीय रेल्वेचे (मॅग्लेव्ह) प्रारूप तयार करून त्याचे यशस्वी प्रात्यक्षिक राष्ट्रीय विज्ञान दिनी सादर करून मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. रावजी शिंदे हे आयआयटी कानपूरचे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी स्वदेशी चुंबकीय तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे भारत सरकारने त्यांचा ‘उत्कृष्ट वैज्ञानिक २०१८’ हा पुरस्कार देऊ न गौरव केला आहे. त्यांनी आपल्या १५ शास्त्रज्ञांच्या चमूबरोबर मागील पाच वर्षांतील अथक प्रयत्नातून चुंबकीय रेल्वेचे प्रारूप तयार केले आहे. या रेल्वेमध्ये चाके नाहीत, ती चालवण्यासाठी केवळ द्रव नायट्रोजन व चुंबकीय शक्तीचा वापर केला जाणार असल्याने या रेल्वेमुळे ध्वनी व वायुप्रदूषण होणार नाही. ही रेल्वे प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर रोजगार निर्मितीबरोबरच नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. या रेल्वे निर्मितीसाठी बुलेट ट्रेनपेक्षा निम्मा खर्च येत असल्याने ती बुलेट ट्रेनला पर्याय होऊ शकते. केंद्र सरकारने बुलेट ट्रेनसाठी मदत मागितल्यास आम्ही त्यासाठी तयार असल्याचे शास्रज्ञ डॉ. रावजी शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान चुंबकीय रेल्वेचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी शंभर मीटरचा ट्रॅक बनवण्यात आला होता. या वेळी ८०० विद्यार्थ्यांनी या रेल्वे प्रारूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. ही रेल्वे प्रतितास ६०० किमी वेगाने धावणार असून जमिनीवर ती विमानाच्या गतीने म्हणजे किमान प्रतितास १२०० किमी धावण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. ही रेल्वे ४० एमएम उंचीवरून म्हणजे हवेत चालणार आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला असून हे पूर्णपणे स्वदेशी प्रारूप असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली आहे. जपान व चीननंतर हवेतून चालणाऱ्या रेल्वेचा यशस्वी प्रयोग करणारा भारत हा जगातला तिसरा देश बनल्यामुळे जगात भारताचा गौरव वाढल्याचे त्यांनी सांगितले.