राज्यात राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलेलं आहे. शरद पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या आरोपावर उत्तर देताना शरद पवारांनी जोरदार टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असं खरमरीत उत्तर पवारांनी दिलं.

हेही वाचा -राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, संभाजी ब्रिगेडची टीका

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं होतं.

आणखी वाचा -“महाराष्ट्रात जातीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जन्मानंतर मोठा झाला”, राज ठाकरेंचा थेट आरोप!

या वक्तव्याची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. संभाजी ब्रिगेडनेही राज ठाकरेंवर टीका केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणतात, राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.