पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असून पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले 2019ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती, अशा शब्दात शिवसेनेने मोदींच्या मुलाखतीचा समाचार घेतला आहे. मुलाखत गाजेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही, असेही पक्षाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीवरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून गुरुवारी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी व प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी होती. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी एकाच वाहिनीस मुलाखत देऊन ती प्रसारित केली. या मुलाखतीतून राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर ते बोलले, पण जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तरे मिळाली का?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

राम मंदिराबाबत मोदींनी स्पष्टीकरण दिले असून यावरुन शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले. ‘राम मंदिराबाबत मोदी पहिल्यांचा खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, हा प्रश्न असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

शीख हत्याकांडाबद्दल ज्याप्रमाणे काँग्रेसला माफी मागावी लागली तसे हिंदू नरसंहाराबद्दल माफी मागा असे कोणी म्हणाले तर त्यांच्याही भावना समजून घ्या, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

राममंदिर व पाकिस्तान या दोन प्रमुख विषयांमुळे भाजपाला सत्ता मिळाली आणि मोदी पंतप्रधान बनले, पण जनतेच्या हाती धुपाटणेच आले. ‘‘पुढील निवडणूक जनता विरुद्ध महाआघाडी’’ असा नारा मोदी यांनी दिला आहे. मग 2014 साली त्यांना पाकिस्तान, इराणच्या जनतेने मतदान केले होते काय व पाच राज्यांत भाजपचा पराभव करणारा मतदार ही या देशाची जनता नव्हती काय?, असा प्रश्नांची सरबत्तीही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

नोटाबंदी हा झटका नव्हता, तर जनतेसाठी फाशीचा खटका होता, अशी टीका शिवसेनेने केली.  मोदींची मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती, असा टोलाही यात लगावण्यात आला आहे.