संदीप आचार्य

शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘जन आशीर्वाद’ यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, “मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही”.

नारायण राणेंचा एकनाथ शिंदेबद्दल गौप्यस्फोट; म्हणाले, “लवकरच…”

“नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. तसेच अनेक चांगल्या योजना राबविण्याचे काम सुरू आहे. नारायण राणे ‘साहेब’ हे स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना एक नक्कीच माहित असणे अपेक्षित आहे की कोणत्याही खात्याचा धोरणात्मक निर्णय जो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही. माझ्याच नव्हे तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनच घेतले जातात व ते योग्यच आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले. “नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘एकनाथ शिंदे केवळ सही करणारे मंत्री’

“ठाणे जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असून त्याला खिंडार पाडण्याचे अनेक उद्योग भाजपाकडून वेळोवेळी केले गेले आहेत. त्यातूनच एकनाथ शिंदे शिवसेनेत अस्वस्थ असे पिल्लू यापूर्वीही भाजप नेत्यांनी अनेकदा सोडून बघितले आहे. ‘मी कंटाळलो’ हा जावईशोध नारायण राणे यांनी असाच लावला असावा,” असे सांगून शिंदे म्हणाले, शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. उद्धव ठाकरे यांनी अपार विश्वास दाखवला मग मी कंटाळण्याचा प्रश्नच कुठे येतो असा सवाल त्यांनी केला.

नारायण राणे यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली आहे तर त्यांनी ‘जन आशीर्वाद’ कसा मिळेल याची काळजी घ्यावी त्याऐवजी शिवसेनेत कोण नाराज आहेत आणि कोण कंटाळले आहेत, यावर बोलून त्यांना फुकट वेळ दवडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असा टोला शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार भक्कम आहे व ते पाच वर्षाचा कार्यकाळ सहज पूर्ण करेल. हे सरकार टिकणार नाही. पाच महिन्यात पडेल. हे फुटतील, ते फुटतील अशा अनेक फुसकूल्या भाजप नेत्यांनी सोडून बघितल्या पण एक विटही हलली नाही. आता नारायण राणे ‘साहेब’ काही हलत का त्याची चाचपणी करत असावे. एक सांगतो, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व भक्कम असून एकनाथ शिंदे तर सोडाच पण एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी वसई विरार शहरात आली. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,” असं नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असं विचारण्यात आलं असता, “आले तर घेऊन टाकू” असं उत्तर दिलं. एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला.