सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान राणेंच्या यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. तसेच राणे यांच्या यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असं देखील सामंत यांनी जाहीर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे.

तो केवळ योगायोग समजावा

पालकमंत्री उदय सामंत देखील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उदय सामंत म्हणाले, “कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असं काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. गेली तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाही.”

हेही वाचा- …म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींबद्दल केलं चप्पलांनी मारण्याचं वक्तव्य; संजय राऊतांनी सांगितला ‘संदर्भ’

आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान

“तसेच कालची जी कारवाई होती ती कायदेशीर होती. प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु हा पक्ष वाढवत असतांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याचा अभिमान असतो. तसा आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान आहे. गर्व देखील आहे. मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित देशाच्या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्धव ठाकरे आल्यामुळं काही लोकांना ते आवडलं नसेल,” असे उदय सामंत म्हणाले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनी सोबत बोलत होते.

हेही वाचा- नारायण राणेंना धडा शिकवण्यासाठीच तुम्ही हे सर्व केलं का?; संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…

भाजपाचे खोटे आरोप

जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपावार उदय सामंत म्हणाले, “भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय सन्यास घेईल, असे सामंत म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. ते गणपतीच्या पार्श्वभूमिवर असेल अन्य कोणत्या पार्श्वभूमिवर असेल.”