टाळेेबंदीच्या काळात ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळताच, त्यांच्यात घरी जाण्यासाठी आशेचा किरण प्रज्वलित झाला. पण या मजुरांना त्यांच्या घरी सोडणार कोण आणि कसे? हा बिकट प्रश्न होताच! कोरोनाच्या सावटात वाहनांची आणि त्यावरील वाहकांची वाणवा असणे स्वाभाविक होते. पण अशाही वेळी ‘डीएनआर ट्रॅव्हल्स’ पुढे सरसावले. या ट्रॅव्हल्सचे संचालक राणा पाल सिंग यांनी समोर येऊन जिल्ह्यांतर्गत सर्व मजुरांची निशुल्क घरवापसी केली. नुकतेच, कॅन्सरग्रस्त रुग्णाला नागपूरला येण्याजाण्याचा प्रवास निशुल्क करणारी हीच ती संस्था! ‘डीएनआर’च्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चंद्रपुरात अडकलेल्या बल्लारपूर, कोठारी, तोहगाव, आरवी, लाठी, सोनापूर, वेळेगाव आणि जुना पोळसा या गावांतील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी साधन नव्हते. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांनी डीएनआर ट्रॅव्हल्सचे संचालक राणापाल सिंग यांच्याकडे याबाबतच्या व्यवस्थेसाठी विनंती केली. एरवी, गाड्या पाठवणे कठीण नसते. पण सद्यस्थितीत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय बंद आहे. त्यांचे सर्व वाहकही सुट्ट्यांवर आहेत. त्यांना बोलावले तरी, कारोनाच्या संक्रमन काळात ते यायला तयार होत नाहीत झालेच, तर ते ज्या ठिकाणी किरायाने राहतात, तेथील घरमालक त्यांना असे धाडस करण्यास मज्जाव करतात. अन्यथा, आपल्या कुटुंबासह आमचे घरच सोडा, असा दम भरतात. अशा बिकट परिस्थितीत राणापाल सिंग यांनी हे सोपस्कार पार पाडले. वाहकांना बोलावून आपल्या गाड्यांतून या मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडून दिले आणि तेही नि:शुल्क! त्यांनी ठरवले असते, तर बंदच्या काळात हे शक्य नाही, असे त्यांना सांगता आले असते, पण त्यांनी सामाजिक जाणीवेचा आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारला, त्यासाठी त्यांचे कौतुक होत आहे. आणखी वाचा- करोनारुपी संकटात पंढरीचा विठुराया घेतोय भुकेल्या माणसांसह जनावरांची काळजी काही महिन्याआधीच त्यांनी कॅन्सरच्या रुग्णाला उपचारासाठी नागपूरला येणे-जाणे मोफत केले होते. आधीच औषधोपचाराचा खर्च आणि त्यात सातत्याने होणारा नागपूरच्या प्रवासाचा खर्च अनेक रुग्णांना झेपत नाही. डीएनआर ट्रॅव्हल्सने चंद्रपूर-नागपूर मार्गावर धावणार्या त्यांच्या सर्व गाड्यांमध्ये कॅन्सर रुग्णांना मोफत प्रवासाची सोय करून दिली. त्यासाठी आमदार मुनगंटीवार यांना ‘डीएनआर’च्या या सेवाभावी कार्यासाठी पत्र लिहून त्यांचे कौतूक केले होते, हे विशेष. राणापाल सिंग, अमरितपाल सिंग, जितेंद्रपाल सिंग आणि परमजित सिंग यांच्या माध्यमातून डीएनआर ग्रुप सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देत असतो.