स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी, ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीच्या मुद्यावर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत मोर्चे काढले. तसेच जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील आदी मंत्र्यांवर टीका केली. शेट्टी यांचा बदललेला रोख लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारकीची शिफारस रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. यावरून आज राजू शेट्टी यांनी कोल्हापूर माध्यमांशी बोलताना, “वेळा प्रत्येकाच्या येत असतात ; एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे.” असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. सत्ताधाऱ्यांवरील टीका राजू शेट्टी यांना भोवली राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव वगळण्यात आल्याच्या मुद्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, “एकतर सध्या मी या पूरग्रस्तांच्या आंदोलनामध्ये आहे. स्वाभिमानी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी विधानपरिषद हे काही आमचं साध्य नाही किंवा ते नाही मिळालं तर आम्ही किंवा आमच्यातील काही दहा-वीस लोक आत्महत्या करतील असं काही नाही. एक समझोता झाला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीकडे एक जागा आणि काँग्रेसकडे एका जागा लोकसभेची आम्ही मागितलेली होती. काँग्रेसने सांगलीची जागा दिली, पण राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागेच्या ऐवजी समजा त्यांची सत्ता नाही आली तरी देखील, महाराष्ट्राच्या विधानसभेत जी आमदारा संख्या आहे त्यावरून, जी निवडली जाणारी विधानपरिषद आहे ती किंवा सत्ता आली तर राज्यपालांच्या कोट्यातून सरकारला जे काही १२ आमदार नेमता येतात, त्यातली एक जागा स्वाभिमानी पक्षाला द्यायचं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी कबूल केलेलं होतं.” आम्हाला अशा दयेची गरजही नाही - तसेच, “जो समझोता झाला होता त्यानुसार एक विधानपरिषद स्वाभिमानीला मिळणार आहे एवढच. मग त्यासाठी एवढी चर्चा आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून, असं काय कोण आमच्यावर मेहरबानी करत नाही किंवा कुणी आमच्यावर दया करत नाही आणि आम्हाला अशा दयेची गरजही नाही.” असं देखील राजू शेट्टींनी यावेळी बोलून दाखवलं. राजकारण हे एक आमचं एक साधन आहे ते आमचं साध्य नाही - “आम्ही राजकारण चळवळ मजबूत करण्यासाठी करतो. राजकारण हे एक आमचं एक साधन आहे, ते आमचं साध्य नाही आणि भविष्यात देखील असणार नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा फारसा फरक पडत नाही. वेळा प्रत्येकाच्या येत असतात, ज्या त्या वेळी बघू काय करायचं ते. एकाएकाचे हिशोब चुकते करायला मी समर्थ आहे. पण सध्या मला लोकांचे प्रश्न सोडवू द्या.” असं शेवटी म्हणत राजू शेट्टींनी सूचक इशारा देखील दिला. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा - दरम्यान, पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.