राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध भागांचे दौरे करत आहेत. आज  ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी  पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आल्याची घटना घडली.  यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचेही दिसून आले.  कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.

“…नाहीतर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील गावकऱ्यांना केलं आवाहन

यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर, यावेळी शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  शाहुपुरीतच थांबले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. या वेळी फडणवीसांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती. या भेटीमुळे आता विविध राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या आहेत.

२०१९ ला सरकारने केलेली तशी मदत करा अशी लोकांची मागणी : देवेंद्र फडणवीस

या भेटीबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी  सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांता निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरं होईल. मुख्यमंत्र्याचा अशाप्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली. यावेळी परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, असं फडणवीस म्हणाले असल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना दरेकरांनी दिली.