राज्यातील सत्तेचा पेच दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसत आहे. आज विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याद्वारे समोर आल्याने भाजपाला हा धक्का असल्याचे बोलले जात होते. मात्र, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे. यासंदर्भात भाजपा नेते आशिष शेलार यांनी माध्यमांना माहिती देताना भूमिका मांडली. आशिष शेलार म्हणाले की, काल जयंत पाटील यांनी विधीमंडळ कार्यालयात गटनेते पदावरून प्रतिदावा दाखल केलेला आहे. त्यांनी सादर केलेले पत्र म्हणजे प्रतिदावा आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे व हे कायदेशीर मत आहे. अजितदादा पवार यांच्या गटनेता पदाच्या नियुक्तीचं पत्र राज्यपाल भवनात आहे. अजित पवार यांनी राज्यपाल भवनाशी आणि राज्यपालांशी एकदा नाहीतर दोनदा गटनेता म्हणून चर्चा केलेली आहे. यानंतर त्या आधारावरच राज्यपाल महोदयांनी निर्णय घेतला आहे. विधीमंडळ कार्यालयाला मर्यादा आहेत. मात्र आम्ही गटनेता बदलला असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्याचा काल प्रयत्न झाला. परंतु न्यायालयाकडून कालच यास मान्यता देण्यास नकार देण्यात आल्याचं दिसत आहे. म्हणून आता जर अजित पवार व राज्यपाल भवन यांचा दावा असताना, प्रतिदावा जयंत पाटील यांनी केला असेल, तर याविषयीचे सर्व अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे कायदेशीरित्या असतात. कायद्याच्या प्रक्रियेनुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे अजित पवार यांच्या गटनेता पदाबाबत आणि त्यावर जयंत पाटील यांच्या प्रतिदाव्याची शहानिशा करतील व निर्णय घेतील. BJP leader Ashish Shelar in Mumbai: We are confirmed that Ajit Pawar is the leader of NCP on the Floor of the House, and his whip will hold as leader of legislature party pic.twitter.com/4fUADA26c3 — ANI (@ANI) November 26, 2019 राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्रच सोमवारी सचिवालयाकडे दिले आहे. या पत्रानुसार जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाध्यक्ष किंवा सरचिटणीस करतात. कोणत्या नेत्याची या पदी निवड झाली आहे याची माहिती 30 दिवसांमध्ये विधावसभा अध्यक्ष किंवा विधानभवन सचिवांना देणे बंधनकारक असते. भाजपाने विधिमंडळ पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याचे तर शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र सचिवांकडे दिले आहे. काँग्रेसने अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही. मात्र तो कधी निवडावा यासाठी काही कालमर्यादा नसून तो हक्क पक्षाकडे राखीव असतो.