महाराष्ट्रात सत्तेची समीकरणं रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेकजण बोलत आहेत मी त्याबाबत काहीही बोलणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्तेची समीकरणं रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होईल याची खात्री बाळगा असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दिल्लीमध्ये जाऊन आज देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे युती शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचे निवडणूक निकाल लागले. शिवसेनेला ५६ तर भाजपाला १०५ जागा मिळाल्या. या सगळ्या सत्ता समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा केली जाते आहे. शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. तर मुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्षे वाटून घ्या असं म्हटलं होतं. यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत अडचणी येत आहेत. महाराष्ट्राच मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सरकार स्थापनेच्याही विविध चर्चा सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे सांगत आहेत. रविवारी तर त्यांनी आमच्याकडे १७० आमदारांचं पाठबळ असल्याचंही सांगितलं. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.