युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वरळीत पदयात्रा काढत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरेदेखील उपस्थित होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वरळीतील जनतेचे आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे आभार मानले. आदित्यचा स्वीकार केल्याबद्दल मी ऋणी असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली तेव्हा उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मात्र आज अर्ज दाखल होत असताना पत्नी रश्मी ठाकरे तसंच मुलगा तेजस ठाकरेसोबत ते उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाही असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “जे आदित्यला आशिर्वाद देत आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, शिवसेनेची समाजसेवेची परंपरा पुढच्या पिढीत कायम राहत आहे. आम्ही निवडणूक न लढण्याचं ठरवलं होतं, पण हे नवीन पिढीचे विचार आहेत. तरुणांच्या विचाराने देश आणि राज्य पुढे जावं हीच इच्छा आहे”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी . स्थानिक आमदार सुनील शिंदेंचेही आभार मानले. आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना जनतेचं प्रेम नवा महाराष्ट्र घडवण्यास मदत करेल असं म्हटलं आहे.