"राज्यातील काही भागांत टाटा समूहाची सात धरण आणि कोयना धरण आहे. या धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केली जाते. वीज निर्मिती झाल्यावर ते पाणी समुद्रात सोडले जाते. हे अनेक वर्षापासून होत आले आहे. हे पाणी दुष्काळी भागात घेऊन जाणार आहोत. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही व्यक्तीला पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले, "वीज निर्मिती झालेलं पाणी दुष्काळी भागात पाणी घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर कधीच चर्चा केली नाही. त्यामुळे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ कायम दुष्काळी राहिला आहे. आता आमची राज्यात सत्ता आल्यास धरण प्रशासनासोबत चर्चा केली जाईल. दुष्काळी भागात पाणी घेऊन जाऊ," असं आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्यांवरही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करीत शिवसेना भाजपावर टीका केली. ते म्हणाले, "काहीजण धर्माच्या, तर काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत प्रश्नावर कोणताही पक्ष निवडणूक लढविताना दिसत नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता तरी राज्यातील पक्षांनी सर्व सामन्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवल्या पाहिजे. अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.