अहिल्यानगर : श्रीरामपूर काँग्रेसमधील स्व. जयंत ससाणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष संजय फड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांच्यासह काँग्रेसच्या १० माजी नगरसेवकांनी आज, मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
या प्रवेशामुळे श्रीरामपुरातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणाऱ्या ससाणे गटाला मोठे भगदाड पडले आहे. जिल्हा बँक संचालक करण ससाणे यांना सुरुवातीपासून साथ देणारे संजय फड यांनी साथ सोडलीच शिवाय त्यांच्याबरोबर श्रीनिवास बिहाणी, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, माजी नगरसेवक भारती कांबळे, दत्तात्रय सानप, शामलिंग शिंदे, आशिष धनवटे, राजू आदिक, कैलास दुबय्या, शशांक रासकर, मनोज लबडे, सोमनाथ गांगड, संदेश उर्फ संजय गांगड, भैरवनाथ सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर फरगडे, पंचायत समितीचे उपसभापती सुनील क्षीरसागर, उंबरगावचे सरपंच विराज भोसले, उपसरपंच शिरसगाव ॲड. युवराज फंड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वैभव लोढा, दत्तात्रय ढालपे, नीलेश बोरावके, सिद्धार्थ फंड आदींनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा भाजप प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जातात.
नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल : आमदार ओगले
पक्षप्रवेशावर बोलताना काँग्रेस आमदार हेमंत ओगले म्हणाले, यामुळे फारसा फरक पडत नाही. ते गेल्यामुळे संधीअभावी थांबलेल्यांना संधी मिळेल. पक्षाची नव्याने बांधणी करू. आगामी पालिका निवडणूकही जिंकू. आपण सत्तेपुढे वाकणारे नाहीत. जे गेले ते मनाने गेलेले दिसत नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल.
ज्याने-त्याने ठरवायचं : भानुदास मुरकुटे
ससाणे गटाबरोबर अशोक कारखाना निवडणुकीपूर्वी संजय फंड यांच्या घरी एकत्र बैठक होवून ससाणे- मुरकुटे सहमती एक्स्प्रेसचा निर्णय झाला होता. तेच फंड आता भाजपकडे जात असल्याकडे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, लोकशाही आहे, कोणी कोठेही जाऊ शकतो, आपण याबाबत काेणाला काही म्हणू शकत नाही. मात्र, फंड यांच्या घरी सहमती एक्स्प्रेसबाबत जी बैठक झाली, त्याप्रमाणे आपण शब्द पाळणारे आहोत. बाकीच्यांनी शब्द पाळायचा की नाही हे ज्याने-त्याने ठरवायचं.
श्रीरामपूरच्या विकासासाठी : संजय फंड
श्रीरामपूरच्या विकासासाठी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीनिवास बिहाणी यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील व भाजपशिवाय श्रीरामपूरचा विकास शक्य नाही, अशी परिस्थिती आहे. स्व. जयंतराव ससाणे यांचे श्रीरामपूरला मुबलक पाणी देण्याचे स्वप्न होते. आता नव्या साठवण तलावासाठी विखे पाटील यांनी १७५ कोटी रुपये दिले, त्याचे काम सुरू झाले. मंत्री विखे यांनी श्रीरामपुरात अतिक्रमण हटावमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्याच्या पुनर्वसनाचा शब्द दिला आहे. गोरगरिबांसाठी ४ हजार घरकुले बांधण्यात येणार आहे.
व्यक्तिगत कारणे असू शकतात : सचिन गुजर
ससाणेंची संघटना ही मित्र व सहकाऱ्यांची आहे. ते एकजूट राहिले पाहिजे, असे आपले मत आहे. पक्ष सोडून जाण्यामागे त्यांचे व्यक्तिगत काही कारण असू शकते, असे सचिन गुजर म्हणाले.