अकोले: देवरायांच्या संरक्षण व संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याची योग्य अंमलबाजावणी झाल्यास अकोले तालुक्यातील देवरायांना संजीवनी मिळणार आहे; तसेच देवरायांचे सर्वेक्षण होऊन तालुक्यातील देवरायांची निश्चित संख्या, त्यांचे क्षेत्रफळ, जैवविविधतेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व आदी बाबी निश्चित होणार आहेत.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र मानलेले जंगल. हे जंगल परंपरेने समाजाने जपलेले असते. भीमाशंकर ते कळसुबाई या परिसरात ५० गावांत सुमारे १०० च्या आसपास लहान-मोठ्या देवराया आढळतात. अकोले तालुक्यात घाटघर, पांजरे, रतनवाडी, सातेवाडी, फोफासंडी, लव्हाळी, कुमशेत, कोथळा आदी ठिकाणी देवराया आहेत. कुमशेत येथे ५, तर फोफासंडीला ६ देवराया आढळतात. देवराया या जैवविविधतेची खाण आहेत. देवरायांची एक परिसंस्था असते.

सुमारे २० एकर क्षेत्रफळ असणारी कोथळा येथील ‘भैरोबाची राई’ जैवविविधतेच्या दृष्टीने सर्वांत समृद्ध समजली जाते. लोध नावाचा महावृक्ष याच देवराईत आहे. या देवरायांमध्ये काही देवराया खासगी मालकीच्या आहेत. देवरायांची निसर्गसंपदा अद्याप टिकून असली, तरी काळाच्या ओघात काही देवरायांचे वैभव विविध कारणांमुळे लोप पावत चालले आहे. राज्यात सुमारे साडेतीन हजारांपेक्षा अधिक देवराया असाव्यात. देवरायांची वने जैवविविधतेने समृद्ध आहेत. पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून देवराईच्या संरक्षण व संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वन विभागाने मार्गदर्शक तत्त्वांचा आदेश काढला आहे.

या निर्णयानुसार सर्व देवरायांची गावनिहाय अद्ययावत यादी, देवराईचे भौगोलिक संदर्भित नकाशे तयार करणे, तेथील जैवविविधतांचे मूल्यांकन, वनस्पती आणि प्रमुख प्राणी-प्रजातींची विविधता, संख्यात्मकता आणि रचना दस्तऐवजीकरण करणे, तेथील दुर्मीळ, संकटग्रस्त आणि लुप्तप्राय वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींची नोंदणी करून संरक्षण व संवर्धनाचे उपाय राबवण्यात जैविक महत्त्व व धोके आधारावर प्राधान्यक्रम ठरवणे.

स्थानिक पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करावे, स्थानिकांना विश्वासात घेऊन क्षैत्र जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे प्रयत्न करणे. राज्य जैवविविधता मंडळाचे (नागपूर) सचिव अंमलबजावणी यंत्रणा असून काही बाबींची जबाबदारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांची असेल.

उत्तर सह्याद्रीतील कळसुबाई-भीमाशंकर परिसरात वन व राईच्या रूपात देवराया राखल्या आहेत. येथे सह्याद्रीतील मूळ प्राथमिक जंगल देवराईच्या रूपात पाहायला मिळते. लोकसंवर्धित क्षेत्र म्हणून देवरायांना जागतिक पातळीवर विशेष महत्त्व आहे. विविध वन्यजीवांचा अधिवास व भ्रमणमार्ग या देवरायांमुळे टिकून आहे. राज्य शासन स्थानिक लोकांना प्रोत्साहन देऊन या देवरायांना संरक्षण देता येईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार देवरायांना ‘कम्युनिटी रिझर्व्ह’ असा दर्जा देता येईल. शासकीय व अशासकीय घटकांना देवरायांचा हा जैव-सांस्कृतिक वारसा जतनाची उत्तम संधी आहे.-विजय सांबरे, देवराई अभ्यासक