सातारा जिल्ह्य़ात मंगळवारी सायंकाळनंतर झालेल्या तुफानी पावसात वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू झाला. नऊ शेळ्या ,एका गाईचा या पावसात बळी गेला आहे. या पावसाने शेती आणि स्थावर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मंगळावारी सायंकाळी सातारा ,कराड,जावली,कोरेगाव,माण भागात पावसाने थमान घातले. ठिकठिकाणी वीज पडल्याने चौघांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र किसन शिरतोडे (वय ५२ रा. कलेढोण ता. खटाव), निखिल चंद्रकांत शिंदे (वय २२ रा. हरळी ता. खंडाळा) व द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (वय५५ रा. अहिरे, ता. खंडाळा) तसेच कोलवडी येथे एक जणाचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
सातारा येथील पाटखळ माथा येथे वीज पडून १० शेळ्या आणि एका गाईचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे रहिमतपूर रस्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काशिळ ,शिवथर परिसरात पावसाच्या जोरदार सरींनी ‘ग्रीन हाउस’चे नुकसान झाले. मलकापूर ,लोणंद,वडगाव या भागातील घरांवरचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या िभती कोसळल्या.बुधवारी सायंकाळीही जोरदार वारे वाहत होते.काही ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कृषीविभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु आहे.
कराडमध्येही नुकसान
कराड – वळवाच्या पावसाने काल मंगळवारी दुपारनंतर थैमान घातले. त्यात प्राधान्याने कराड परिसरासह तालुक्याची पुरती दैना उडाली. या वादळी पावसाने दुष्काळी फलटण, खटाव, खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या सर्वच विभागात हजेरी लावली. या पावसाने तीन बळी घेतले. वादळी पावसाने होणा-या नुकसानीमुळे शेतकऱ्यासह सामान्य जनता हवालदिल आहे.
वादळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला. झाडे कोसळून ठिकठिकाणचे मार्ग ठप्प झाले होते. घरावरील पत्रे उडून जाणे, कच्च्या भिंतींच्या घरांची पडझड झाल्याचे प्रकार मोठय़ाप्रमाणात घडले आहेत. या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याने त्याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु, गत ८ दिवसांपूर्वी अशाचप्रकारे कोसळलेल्या अवकाळी पावसातील ३५ लाखांच्या नुकसानीपेक्षा मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 people died due to lightning in satara