सावंतवाडी : गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने तब्बल ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथील चर्चच्या नजिक दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
१८ एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त वरवडे फणसनगर येथे कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले. उपचार करण्यात आलेल्या सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले, गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम वरवडे फणसनगर सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केला. कार्यक्रमानिमित्त लावण्यात आलेल्या लाऊड स्पिकरच्या आवाजामुळे मधमाशा उठल्या असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सुमारे ७०० ते ८०० ख्रिश्चन बांधव उपस्थित होते. मधमांशांनी अचानक हल्ला करताच एकच धावपळ उडाली.
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. जखमींना रुग्णालयात आणण्यासाठी वरवडे येथील फ्रैंकी फर्नाडिस यांनी मदत केली. तसेच पोलीस निरीक्षक मारुती जगतापही दाखल झाले होते, सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉ. पंकज पाटील यांच्यासहित डॉ. अक्षय पाटील, डॉ. अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली. वरवडे फणसनगर येथे घडलेल्या या मधमाशा हल्ला प्रकरणानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.