अहिल्यानगरः जागतीक महिला दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात तब्बल ४०९८ घरकुलांमध्ये महिलांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला. त्यामध्ये सन २०२४-२५ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण केलेले २४१२ तसेच रमाई आवास, शबरी आवास, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत उभारलेल्या घरकुलांचा समावेश आहे.
यासह जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या एकूण ८१७३८ घरकुलांच्या लाभार्थींपैकी ६८३११ लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन, जिल्ह्यातील १३११ ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आले. या लाभार्थ्यांच्या घराचे भूमिपूजनही महिला, सरपंच, ग्रामसेवक, संपर्क अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत मोरे चिंचोरे (ता. नेवासा) येथील १२६ घरकुलांचे भूमिपूजन, २४ घरकुलांचे गृहप्रवेश, कात्रड (ता. राहुरी )येथील ४८ घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गावात महिला मेळावे आरोग्य शिबीर महिला सभांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, सहायक प्रकल्प अधिकारी किरण साळवे, गटविकास अधिकारी संजय नखवाल (नेवासा) व सुधाकर मुंडे (राहुरी), सरपंच, ग्रामसेवक, महिला सदस्या, ग्रामस्थ उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्याने गेल्या तीन वर्षात विविध योजनेतील घरकुलांच्या उभारणीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत ६४१९ भूमीहीन लाभार्थींना जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता टप्पा-२ मधील ३८४१ लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ११ गृहसंकुले उभारण्यात आली. यंदाही श्रीरामपूर, राहता, कोपरगाव तालुक्यात शेती महामंडळाच्या जागेवर ५०० ते ७०० घरकुलांच्या वसाहती उभारण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.
या वसाहतींमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, वृक्षारोपण आदी सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. मंजूर झालेल्या व आज भूमिपूजन करण्यात आलेली घरकुले १०० दिवसात पूर्ण करावीत, असे आवाहन येरेकर यांनी केले.
आदिवासी तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अकोलेमध्ये सर्वाधिक १२११० लाभार्थ्यांना घरकुलांचा हप्ता वितरित करण्यात आला तर १०३९ घरकुलांमध्ये महिलांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला.