संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे एका शेतामधून तब्बल सात किलो वजानाचं रताळं जमीनीबाहेर काढण्यात महिला शेतकऱ्याला यश आलंय. या रताळ्याच्या इवढ्या वजनामुळे राज्यात त्याची चर्चा होते आहे. हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ येथील हिराबाई नेहे या आजीबाईंच्या शेतात झाला आहे.
हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारची माती असणारं असून मागील वर्षीच्या खरीपाच्या हंगामात ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांद्याचं पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा रताळ्याचा वेल लावला होता. मात्र हा वेल लावल्यानंतर कांद्याचं पिक येऊन गेल्यानंतर त्याच्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही. या शेतामध्ये तीन ते चार महिन्यापासून कोणतेही पीक घेण्यात आलं नाही. त्यामुळे शेताला पाणी देण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही या वेलीला एकच अवाढव्य रताळं आलं. वेल काढताना तिला जमिनीत एकच सात किलो वजनाचे रताळयाचे कंद आल्याचं हिराबाईंच्या लक्षात आलं.
विशेष म्हणजे या वेलीला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा दिलेले नसतांना एवढ्या मोठ्या आकाराचं रताळं या वेलीला आल्याने आता या सात किलोच्या रताळ्याची चर्चा राज्यभरात होऊ लागली आहे.