सोलापूर : कांद्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा उच्चांकी स्वरूपात कांदा आवक होऊन दर मात्र कोसळले असतानाही  मागील वर्षाच्या तुलनेत मागील चार महिन्यात तीन कोटी ७६ लाख २८५३ क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. त्यातून ७३७ कोटी ९६ लाख ६६ हजार ९५० रूपयांएवढी विक्रमी आर्थिक उलाढाल झाली आहे. दर घसरणीमुळे सुमारे ३०० कोटींचा फटका शेतक-यांना सोसावा लागल्याचे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील २०२२-२३ आर्थिक वर्षात मिळून एकूण ७७ लाख ८० हजार ९५४ क्विंटल कांद्याची आवक होऊन त्याद्वारे एकूण ७२६ कोटी ८ लाख १० हजार ७०० रूपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. परंतु मागील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात आॕक्टोंबर ते जानेवारीपर्यंतच्या चार महिन्यांत कांदा आवक आणि आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. एकीकडे कांदा दर कोसळूनही आवक थांबत नसल्याचे पाहावयास मिळाले.

हेही वाचा >>>“राहुल नार्वेकर म्हणजे कोकणच्या मातीला लागलेला कलंक”, उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

प्रामुख्याने गेल्या आॕक्टोंबरपासून कांदा हंगामाला सुरूवात झाली होती. त्या महिन्यात चार लाख ७२ हजार २५० क्विंटल कांदा दाखल झाला असता त्यातून १०९ कोटी ५२ लाख ८१ हजार १०५ रूपयांची  उलाढाल झाली होती. त्यावेळी कांद्याला प्रतिक्विंटल उच्चांकी दर ८५०० रूपये तर सर्वसाधारण दर २४०० रूपये मिळाला होता. आॕक्टोंबरच्या तुलनेत पुढील  नोव्हेंबरमध्ये कांदा आवक वाढून सात लाख २५ हजार १६८ क्विंटलपर्यंत गेली. त्यावेळी कांदा दर  कमाल ८००० रूपये आणि स्थिर दर ३००० रूपये मिळाला. त्यातून झालेली उलाढाल २१६ कोटी ६८ लाख ८४ हजार ३०० रूपये इतकी होती. डिसेंबरमध्ये कांदा आवक आणखी वाढून ती जवळपास दुप्पट म्हणजे १३ लाख ४६ हजार ५६७ क्विंटल इतकी झाली. त्यातून झालेली उलाढाल २५४ कोटी ५० लाख ७१ हजार ९०० रूपये इतकी होती. दर मात्र कोसळले होते. कमाल ५१०० रूपये तर स्थिर दर १६०० रूपयांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे अपेक्षित उलाढाल होऊ शकली नाही.

हेही वाचा >>>“ओबीसीतून आरक्षण मागता आणि मागासवर्गीयांची लायकी…”, छगन भुजबळांची खरमरीत पोस्ट

मागील जानेवारीमध्ये कांद्याचा ओघ सुरूच होता. महिनाभरात १२ लाख १८ हजार ८६८ क्विंटल कांदा दाखल झाला असता त्यातून झालेला व्यवहार १५७ कोटी २४ लाख ५९ हजार ६०० रूपये उलढालीचा ठरला. म्हणजेच दर घसरणीचा फटका आर्थिक उलाढालीला बसला. कारण दर कोसळून अवघ्या १४०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. कमाल दरातही ३००० रूपयांपर्यंत मर्यादित राहिले होते. आॕक्टोंबर ते जानेवारीपर्यंत चार महिन्यात कांद्याचा उच्चांकी दर ८५०० रूपयांवरून ३००० रूपयांवर घसरला. तर स्थिर दर ३००० रूपयांवरून अवघ्या १४०० रूपये ते ७०० रूपयांपर्यंत कवडीमोल झाले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेले निर्बंध, अधुनमधून अतिवृष्टीरूपाने ओढवणारी नैसर्गिक आपत्ती असतानाही एकेका दिवशी दीड लाख क्विंटलपर्यंत कांदा आवक झाल्याचे दिसून आले. त्यातून कांदा लिलाव आणि वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, प्रचंड  कोसळलेले दर, परिणामी, लिलाव स्थगित होणे किंवा एक दिवसाआड लिलाव होऊन दर घसरण न थांबणे, दुसरीकडे मालवाहतूकदारांचा संप, मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी घडलेल्या हिंसक घटनांचा फटकाही कांदा उत्पादक शेतक-यांना सहन करावा लागला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 738 crore turnover from onions in four months in solapur amy
Show comments