रत्नागिरी: दापोली-हण्र मार्गावरील आसूद जोशीआळीजवळ मॅगझीमो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीमध्ये मॅगझीमो चालक अनिल (बॉबी) सारंग यांच्यासह ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दापोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास झाला. अनिल हे मॅगझीमो (एमएच-०८-५२०८) घेऊन दापोलीतून आंजर्लेकडे जात होते. आसूद जोशीआळी येथील वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर मॅगझीमो आदळली. ट्रक वेगात असल्यामुळे मॅगझीमो रस्त्याच्या डाव्या बाजूला फरपटत काही अंतरावर गेली. हा अपघात एवढा भयानक होता की, मॅगझीमोचा चक्काचूर झाला. या गाडीतील पाच जण जागीच, तर दोघांचा रुग्णालयात आणि एका महिलेचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात चालक अनिल सारंग (वय ४५, रा. हण्र), संदेश कदम (५५), स्वरा संदेश कदम (८), मारियम काझी (६४), फराह काझी (२७, सर्व रा. अडखळ), मीरा महेश बोरकर (वय २२, रा. पाडले), वंदना चोगले (३४, रा. पाजपंढरी), सामीया इरफान शिरगांवकर अशा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सामीया शिरगांवकर यांचा डेरवण येथे नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात सपना संदेश कदम (वय ३४, रा. अडखळ), श्रद्धा संदेश कदम (१४, रा. अडखळ), विनायक आशा चोगले (रा. पाजपंढरी), भूमी सावंत (१७), मुग्धा सावंत (१४), ज्योती चोगले (९, रा. पाजपंढरी) यांच्यावर उपजिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   या अपघातात अडखळ येथील कदम कुटुंबातील वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि एक मुलगी जखमी झाले आहेत. अपघात घडताच ट्रक चालक व क्लीनर यांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध दापोली पोलीस घेत आहेत.