लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे ९ रुग्ण आढळून आले असून, या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात ’जीबीएस’ आजाराचा जिल्ह्यातील आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आरोग्य विभागाकडून घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की या आजाराबाबत सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात जीबीएसचे आतापर्यंत ९ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ३ व शहरी भागातील ३ रुग्ण असून, जिल्ह्याबाहेरील २ व राज्याबाहेरील १ रुग्ण आहे. त्यांपैकी ४ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गत तीन वर्षांत या आजाराचे निदान झालेल्यांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोग प्रतिकारक्षमता वाढविणे, तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.

Story img Loader