EY Employee Anna Sebastian Perayil’s Death : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तरुणीच्या अंत्यसंस्काराला तिच्या कार्यालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता, यावरून तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला होता. यावर कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी लिंक्डइनवरून एक पोस्ट करत माफी मागितली आहे.

“तुमच्यापैकी अनेकांना आमच्या पुण्यातील कार्यालयात काम करणाऱ्या ॲना सेबॅस्टियन या तरुणीच्या दु:खद निधनाबद्दल आणि तिची आई, अनिता ऑगस्टीन यांनी मला लिहिलेले दुःखद पत्र माहीत असेल”, असं राजीव मेमानी म्हणाले. ते पुढे म्हणाले, मला खूप दु:ख झाले आहे आणि मी ही एक बाप म्हणून ॲनाच्या आईच्या दुःखाची कल्पना करू शकतो. ॲनाच्या जाण्याने त्यांच्या जीवनातील पोकळी कधीह भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबाप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. ॲनाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहिल्याबद्दल मला खेद वाटतोय. हे आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे वेगळे आहे. यापूर्वी कधीच असं घडले नव्हते; असं पुन्हा कधीच होणार नाही.”

“गेल्या काही दिवसांपासून, मला माहिती आहे की लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आमच्या काही कार्य पद्धतींवर टिप्पणी केली आहे. सुयोग्य कामाची जागा निर्माण करणे हे आमच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचे राहिले आहे आणि आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणाला सर्वोच्च महत्त्व देतो”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> ‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा

“मी प्रतिज्ञा करू इच्छितो की आमच्या लोकांचे कल्याण हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि मी वैयक्तिकरित्या हे उद्दिष्ट पूर्ण करेन. एक सुसंवादी कार्यस्थळ जोपासण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे, आणि ते उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही”, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

EY कंपनीच्या अध्यक्षांनी लिहिलेलं पत्र

मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू

दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माजी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करीत या प्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाला चौकशी करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत केंद्रीय कामगार राज्यमंत्री करंदलाजे यांनी चौकशी करण्याचे जाहीर केले. या प्रकरणी न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.