प्रदीप नणंदकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लातूर : लातूर शहरातील कचरा निर्मूलन प्रक्रियेत महिला सक्षमीकरणाचे नवे प्रारूप विकसित करण्यास यश आले असून २० कचरा वेचक महिलांना तीन चाकी वाहनांची मालकी मिळवून दिली आहे. ही सक्षमीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यासाठी महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि डिक्की या औद्योगिक संघटनेचे संस्थापाक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी पुढाकार घेतला. कचऱ्यातून उदरनिर्वाह चालविणाऱ्या शंभर महिलांना तीन चाकी वाहनांसाठी कर्ज व राज्य सरकार तसेच डिक्की संघटनेकडून प्रत्येकी २५ टक्के अनुदान देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. महापालिकेने त्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारे वाहने घेऊन देण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.

कचरा वेचक महिलांना प्रारंभीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शहरात पूर्वी कचरा वेचक महिला या गल्लोगल्ली फिरून भंगार गोळा करण्याचे काम करत व ते विकूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत जेव्हा घंटागाडी सोबत कचरा वेचण्याचे काम सुरू झाले तेव्हा महिलांना रोजगार मिळाला. तो रोजगार उदरनिर्वाह करण्यास पुरेसा नसे. त्यामुळे या महिलांना सक्षम करण्याची योजना आखण्यात आली.

साधारणपणे महिला कोणतेही काम निगुतीने करतात. दिलेली जबाबदारी पार पाडतात. शहरात भाड्याने वाहने घेऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू होते, त्या ऐवजी या महिलांनाच वाहनांचे मालक बनविण्याचे जनाधार संस्थेच्या वतीने ठरविण्यात आले. पाचशे कुटुंबाचा कचरा गोळा करण्यासाठी एक वाहन या पद्धतीने नियोजन केले तर कचरा गोळा होईल आणि महिलांना प्रतिष्ठा मिळेल अशी कल्पना समोर आली. वाहन खरेदीसाठी एसबीआय बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली. पहिला टप्प्यात २० महिलांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले. एका वाहनाची किंमत तीन लाख ४८ हजार रुपये असून त्यातील ५० टक्के अनुदान मिळणार आहे. अनुदानाशिवाय उर्वरित रकमेला परतफेडीसाठी मुदत पाच वर्ष देण्यात आली आहे.
नव्या योजनेमुळे मजूर म्हणून काम करणाऱ्या महिलांना आता आठ ते हजार रुपयांऐवजी १८ हजार रुपये प्रतिमाह रोजगार मिळेल. अर्चना हरिश्चंद्र गायकवाड गेल्या सात वर्षापासून स्वच्छता ताई म्हणून काम करतात. दहावीपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यांना एक मुलगा बारावीत शिकतोय व मुलगी नववीत आहे. जनाधार सेवाभावी संस्थेमार्फत काम मिळाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येते याचा आनंद झाला. शहरात नजिकच्या पाखर सांगवी शिवारात स्वतःची जागा घेऊन पत्राचा शेड मारून त्यात त्या राहतात. दोन्ही मुलाचे शिक्षण त्या करतात. आता स्वतःचे वाहन मिळणार असल्यामुळे आपण आता मालक होत असल्याचा आनंद वेगळाच आहे, असे त्या म्हणाल्या. अंजना संदिपान सकट या महिला शहरातील विलासनगर भागात राहणाऱ्या शिक्षण नाही त्यामुळे जेमतेम सही करता येते. लिहिता वाचता येत नाही. पंधरा-वीस वर्षापासून त्या कचरा गोळा करण्याचे काम करतात. पूर्वी सकाळी उठून झोळी खांद्याला अडकवून भंगार गोळा करत असत. पतीही घंटागाडीवर मजूर म्हणूनच काम करत. कसलेही शिक्षण नाही जनाधार सेवाभावी संस्थेत काम करत असल्याने उदरनिर्वाहाची समस्या मिटली व आता स्वतःचे वाहन मिळत असल्याने मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील पहिली मनपा

जनाधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या क्षेत्रात काम करतो आहोत. महिलांच्या मार्फत काम केले तर ते चांगले होते हा आपला अनुभव आहे. त्यामुळेच कचरा वेचक महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनाच वाहन घेऊन द्यावे त्यासाठी आवश्यक ती मदत करावी यासाठी आपण प्रयत्न केले. वीस वाहने एसबीआय बँकेने कर्जावर दिली आता अनेक बँका पुढे येत आहेत. १०० वाहने खरेदी केली जाणार आहेत त्याला मंजुरी मिळाली आहे. ६५ महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे व उर्वरित ३५ महिलांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जनाधारचे संजय कांबळे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new way of women empowerment 20 women garbage pickers owned e vehicles asj