शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी (२ ऑगस्ट) शिवसंवाद यात्रा पाटणमध्ये पोहचल्यानंतर केलेल्या भाषणात शिवसेनेतील बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. “मी आधी बोललो नव्हतो, पण आज मुलगा म्हणून बोलतो आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचं कुटुंब खचून गेलं असतं, तर महाराष्ट्राचं काय होणार ही चिंता होती,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव करत बंडखोरी केल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “जेव्हा उद्धव ठाकरेंवर पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी जागतिक पर्यावरण परिषदेत बाहेर होतो. मला माझ्या वडिलांचं, माझ्या पक्षप्रमुखांची शस्त्रक्रिया होणार आहे हे माहिती होतं. मी त्यांना विचारलं बाबा तुमची शस्त्रक्रिया आहे मी काय करू? ते म्हणाले तू जा, तू स्वतःसाठी नाही, तर महाराष्ट्रासाठी जात आहे. तू जायला पाहिजे.”
“मी आधी बोललो नाही, आता मुलगा म्हणून बोलतो आहे”
“त्यांच्यावर एकाच आठवड्यात एक नाही तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल त्यांना माहिती आहे शस्त्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी किती भीतीदायक वातावरण असतं. आपण दातांच्या डॉक्टरांकडे किंवा लस घ्यायला जातो तरी घाबरतो. मनात भीती असते. मात्र, उद्धव ठाकरेंवर एक नाही, तर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर काय झालं हे मी आधी बोललो नाही, मुलगा म्हणून आता बोलतो आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचं कुटुंब खचून गेलं तर महाराष्ट्राचं काय होणार ही चिंता होती,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
“मी उद्धव ठाकरेंच्या वेदना, दुःख बघत होतो”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंच्या वेदना, दुःख बघत होतो. ते रुग्णालयातील बेडवरून हलू शकत नव्हते. हातापायांची जास्त हालचाल होत नव्हती. असं असतानाही कोणत्याही पक्षाच्या आमदार, मंत्र्याने, प्रशासकीय अधिकाऱ्याने फोन केला तर उद्धव ठाकरे बोलण्याचा प्रयत्न करत होते. व्हॉट्सअप केला तर बोलत होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत होते. महाराष्ट्रातील काम त्यांनी कोठेही थांबू दिलं नाही.”
“निर्लज्ज गद्दारांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव केली”
“दुसरीकडे हे निर्लज्ज गद्दारांचे नेते ज्यांनी उद्धव ठाकरेंची काळजी घ्यायला हवी होती, विचारपूस करायला हवी होती, सांगायला हवं होतं की मी तुमच्यासोबत आहे त्यांनी हे काहीच केलं नाही. या गद्दारांनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना आमदारांची जमवाजमव सुरू केली. तू येतो का माझ्यासोबत, चला शिवसेना फोडुया, मला मुख्यमंत्री करा असे प्रकार या गद्दारांनी केलं,” अशी माहिती ठाकरेंनी दिली.
हेही वाचा : “गेले एक महिना या गद्दारांचं…”, कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
“हे राजकारण तुम्हाला पटणारं आहे का? मी हे दुःख बघितलं आहे, तो कठीण प्रसंग बघितला आहे. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्वकाही दिलं, ज्या माणसाने तुम्हाला सर्वकाही दिलं, तो माणूस कठीण काळत जाताना गद्दारी केली,” असंही त्यांनी नमूद केलं.