शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लोकसभेत मंजूर झालेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच शिंदे गटातील नेत्यांवर महिलाविरोधी कृत्ये केल्याचा आरोप करत घटनाबाह्य सरकार किती दिवस चालू शकतं, असं म्हटलं. ते गुरुवारी (२१ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
“महिला आरक्षणाचं विधेयक ‘जुमला’ आहे”
महिला आरक्षणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “संसदेत मांडण्यात आलेलं महिला आरक्षणाचं विधेयक ‘जुमला’ आहे. आमचा महिला आरक्षणाला नक्की पाठिंबा आहे. मात्र हा जुमला तर नाही ना हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. जनगणना कधी होणार, मग पुनर्रचना कधी होणार? ही सर्व कार्यवाही झाल्यावर महिला आरक्षण मिळेल. त्यामुळे हा निवडणुकीपुरता एक जुमला आहे.”
“ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते…”
“आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना शिवीगाळ केली. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. ज्या आमदाराच्या मुलाने अपहरण केलं आणि ते सीसीटीव्हीत पकडले गेले तेथे काहीही कारवाई झालेली नाही,” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
“महाराष्ट्रात वारकऱ्यांवर, मराठा युवकांवर लाठीचार्ज होतो”
“एक गद्दार आमदार असे आहेत ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीच्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता. त्याचे ‘बुलेट शेल्स’ही मिळाले, तरीही अद्याप कारवाई झालेली नाही. याच महाराष्ट्रात वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो, मराठा युवकांवर लाठीचार्ज होतो, बारसूत महिलांवरही लाठीचार्ज झाला. हे असं घटनाबाह्य सरकार किती दिवस चालू शकतं,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला लगावला.