मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे. यावरून आता दोन्ही नेत्यांमधील संघर्ष वाढत चालला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते बाळापूर याठिकाणी एका जाहीरसभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि ओला दुष्काळाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, मला शेतीतलं फार कळत नाही. पण तुम्हाला होणारा त्रास कळतो. मला तुमच्या डोळ्यातील अश्रू दिसतात. तुमच्या डोळ्यातील अश्रू बघवत नाहीत, म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. तुमच्याशी संवाद साधत आहे. तुमची निवेदनं घेत आहे, ती निवेदनं घटनाबाह्य सरकारच्या दारी पोहोचवत आहे. या भागात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. हफ्ते भरूनही शेतकऱ्यांनी पीक विम्याची भरपाई मिळत नाही. अद्याप पंचनामेही झाले नाहीत. उद्धव ठाकरे असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, जून-जुलै महिन्यात जेव्हा अधिवेशन पार पडलं. तेव्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर आम्ही सर्वच पक्षाचे आमदार आंदोलन करत होतो. तेव्हा आम्ही घसा कोरडा करत होतो. ओरडत होतो. ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत होते. पण हे गद्दार खुर्च्यांना असे चिकटले आहेत की, ते खुर्च्या सोडायला तयार नाहीत. ते खुर्च्यांना घट्ट पकडून बसलेत. मुळात त्यांच्या खुर्च्याही घटनाबाह्यच आहेत. त्यांना तिथे बसण्याचा अधिकारही नाही, तरीदेखील ते तिथे बसले आहेत.

हेही वाचा- “अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाही” नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान

पावसाळ्यात दोन-तीन महिने अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसानंही झोडपून काढलं. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. पण कृषीमंत्री कुठे आहेत? ते कधी बांधावर गेले आहेत का? त्यांना शेतकऱ्यांशी बोलताना पाहिलंय का? मुळात कृषीमंत्री कोण आहेत? त्यांचं नाव तुम्हाला माहीत आहे का? गद्दार कृषीमंत्र्यांचं नाव काय आहे? मुख्यमंत्र्याचं नाव गद्दार आहे, कृषीमंत्र्यांचं नावही गद्दार आहे. मुळात चाळीसच्या चाळीस आमदार गद्दारी करून फिरत आहेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांसह शिंदे गटावर हल्लाबोल केला.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा मूळ प्रस्ताव कुणी दिला? फडणवीसांनी दिलेलं उत्तर ऐकून बसेल धक्का

अब्दुल सत्तारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, परवा कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणाले. होय, मी छोटा पप्पू असेल. मला नावं ठेऊन जर महाराष्ट्राची सेवा होत असेल, तर मला अजून १०० नावं ठेवा. पण या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करा. या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रात पळवून लावलंय. येथून पुढेही महाराष्ट्रात तुम्हाला असंच पळून लावणार, पळवत ठेवणार. कारण तुम्ही जी गद्दारी केलीये, ती या महाराष्ट्राला पटली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray on abdul sattar chhota pappu rmm
Show comments