Aaditya Thackeray on Disha Salian Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी परत करण्यात यावी, अशी मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली आहे. याप्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली असून २ एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू झाला तेव्हा राज्यातील तत्कालीन मंत्री उपस्थित होता, असा आरोप सातत्याने केला जातोय. तसंच, राणे पिता-पुत्रांनी तर थेट हा मंत्री म्हणजे आदित्य ठाकरेचे तिथे उपस्थित होते, असं स्पष्टपणे आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून राणे कुटुंबियांकडून आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहे. दिशा सालियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा राणेंकडून केला जातोय. त्यामुळे आदित्य ठाकरे खरंच दिशा सालियनला ओळखत होते का? दिशाच्या मृत्यूसमयी घटनास्थळी आदित्य ठाकरे उपस्थित होते का? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. यावर त्यांनी आता थेट उत्तर दिलंय. ते बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
दिशा सालियन प्रकरणावर सार्वजनिक व्यासपीठावर बोलणार आहात की नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “गेली पाच वर्षे ते बदनामी करत आहेत. अबू आझमी झालं, औरंगजेब झालं. आदित्य दोन सेशनमध्ये आठवला नव्हता, तो आता आठवला. करूदेत त्यांना बदनामी.”
आदित्य ठाकरे दिशा सालियनला ओळखत होते का?
दिशा सालियनला ओळखत होतात का? असं विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “मी ही तुम्हाला हेच सांगतोय, मी याबाबत कोर्टातच बोलेन. ज्या विषयाशी दूरदूरचा संबंध नाही, त्यात का बोलायचं? जे बदनामी करतात त्यांना पगारच बदनामीचा मिळतो. दिशा सालियनसंदर्भात ज्या बातम्या आल्यात त्या खालच्या कमेंट बघा. त्यांना सत्य माहितेय. निवडणुका आल्या आहे, त्यामुळे बदनामी सुरू आहे, असं सर्वजण म्हणत आहेत. त्यामुळे मी अशा आरोपांना उत्तर देणार नाही. अशा आरोपांना मी कचऱ्याच्या टोपलीत टाकतो.”
मी एकही क्षण शांत बसलो नाही
“आरोप करणारे लोक पुढचे ५० वर्षेही आरोपच करत राहतील. आधीही ते माझ्या कुटुंबावर आरोप करत आले आहेत. त्यांना वाटतं आरोप केल्याने मी शांत बसेन. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आरोप केलेत आणि मी शांत बसलोय, असा एकतरी क्षण तुम्ही मला दाखवा. यांच्या भ्रष्टाचाराचे कपडे रोज फाडतो म्हणून हे बदनामीचे प्रयत्न करत आहे. असे प्रयत्न देशभरात झाले. मला पप्पू म्हणण्याचा प्रयत्न झाला, पप्पू २ म्हणण्याचा प्रयत्न झाला. पण मी उत्तर दिलं होतं की दोन पप्पूंनी सळो की पळो करून सोडलं होतं”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.