हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर विधान भवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन झालं. या फोटोसेशनमद्ये आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. त्यावर आता त्यांचं उत्तर समोर आलं आहे. पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते त्यामुळे मी आलो नाही असं आता आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यांची फोटोसेशनला न येण्याची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

“आज जे फोटोसेशन झालं त्यात सहभागी होण्याची माझी इच्छा नव्हती, मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी होतो. मात्र घटनाबाह्य सरकार जिथे निर्माण झालं आहे आणि पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री बसले आहेत तिथे फोटो काढावा असं वाटलं नाही. मागची रांग की पुढची रांग याने मला काही फरक पडत नाही कारण माझे वडील उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही मी मागच्याच रांगेत उभा होतो. ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, ज्यांनी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर घालवला अशा लोकांसह उभं राहून मला फोटो काढायचा नव्हता.” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

निवडणूक घेण्यासठी सरकार घाबरतं आहे

सिनेटची निवडणूक असो, लोकसभेची निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक असो हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरतं आहे. या सरकारने महाराष्ट्रात लोकशाही मोडीत काढली आहे. कुठलीच निवडणूक घ्यायला निवडणूक आयोग आणि हे सरकार तयार आहे असं दिसत नाही.

आदित्य ठाकरे यांनी असंही म्हटलं आहे की मराठा आरक्षणाची चर्चा सुरु असताना विधान भवनात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते. एककीडे आमदार बोलत आहेत पण मुख्यमंत्री अनुपस्थितत आहेत असं चित्र होतं. कोस्टल रोडला हे सरकार टोल लावण्याचा विचार करतं आहे यांनाही कोणतरी कॉन्ट्रॅक्टर दिसला असेल अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaditya thackeray statement on all party meeting photo session maharashtra winter session scj