करोना काळात सोयीसुविधा घेता न आल्याने वालचंद महाविद्यालयाने २५ टक्के शैक्षणिक शुल्क मार्च अखेर परत करण्याचे आश्वासन मंगळवारी अभाविपच्या आंदैलनानंतर दिले. यामुळे सुमारे पाऊणेदोन कोटी रुपये विद्यार्थ्यांना पर मिळणार आहेत.
करोना महामारीमुळे २ वर्ष महाविद्यालय हे बंद होते. महाविद्यालयातील कुठल्याही सोयी सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता न आल्याने तत्कालीन सरकार ने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपये सवलत देणे हे क्रमप्राप्त होते. परंतु वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही सवलत विद्यार्थ्यांना दिली नाही.
हेही वाचा- आमदार-खासदाराचा अनोखा ‘Valentine’s Day’, रवी राणांनी नवनीत राणांना दिलं खास सरप्राईज
याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार महाविद्यालयाला निवेदन दिले. उपसंचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालयाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अभाविपने मंगळवारी महाविद्यालय बंद आंदोलन केले. यावेळी महाविद्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे साडेतीन तास विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत ठिय्या मारला. उपसंचालक महाविद्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीवर विद्यार्थ्यांकडून दगड ठेऊन निषेध करण्यात आला. दि. ३१ मार्चपर्यंत खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे १६,२५०/- प्रत्येकी, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे १०,०००/- (एकूण शुल्काच्या २५%) एवढे शुल्क विद्यार्थ्यांना परत करून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अभाविप ने आंदोलन मागे घेतले.
एकूण १५६० विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना १ कोटी ७३ लाख ५५ हजार महाविद्यालय परत करणार आहे. हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी देखील शेवटच्या विद्यार्थ्याला शासन निर्णयानुसार शुल्क परतावा मिळेपर्यंत अभाविप पाठपुरावा करत राहील असे अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी व सांगली महानगर मंत्री उत्तरा पुजारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.