वाई: मी दुर्गम डोंगराळ कांदाटी खोऱ्याचाही आमदार आहे. हा भाग अनेक वर्ष विकासापासून वंचित आहे.माझ्या मतदारसंघात अनेक छोट्या मोठ्या लोकवस्तींची गावे आहेत. तेथील कार्यकर्ते नेहमीच विकासकामांसाठी पाठपुरावा करत असतात. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अशी पत्रे देत असतो. त्यातून विकासकामांचा फायदा किंवा गैरफायदा कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेत असेल तर त्याची माहिती प्रशासनाने घेतली पाहिजे. जे चुकीचे असेल ते नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यामुळे चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. कोण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला काय वाटते त्याच्यापेक्षा मला माझ्या मतदारसंघातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यांना काय वाटते याचा विचार करण्याची मला गरज नाही. येथील  सालोशीतील वळवी वस्तीवर  विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी दोषी असल्यास कारवाई करावी. माझे कोणाशीही आणि कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत. मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करून  कामे करत असल्यामुळे चौकशीला तयारी आहे, असे स्पष्टीकरण आमदार मकरंद पाटील यांनी दिले.महाबळेश्वर तालुक्यातील सालोशीतील वळवी वस्तीवर विद्युतीकरण काम मंजूर केले. ट्रान्सफॉर्मर बसवल्यास आजूबाजूच्या गावांचा वीज आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

हेही वाचा >>>मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप, “ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती, भुजबळ मराठ्यांचं वाटोळं..”

संबंधित पत्र विद्युतीकरणासाठी दिलेले होते. यामध्ये मी यासाठी किती रक्कम लागणार, हे नमूद केले नव्हते. त्याबाबतचे अंदाजपत्रक हे संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे असते. यामधून कोणा एका व्यक्तीचा फायदा व्हावा, असा कोणताही हेतू नव्हता. चंद्रकांत वळवी या व्यक्तीशीही माझा कोणताही संबंध नाही. लोकप्रतिनिधींनी शिफारस पत्र दिल्यानंतर गावाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करणे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे काम आहे असे आमदार मकरंद पाटील यांनी विराज शिंदे यांच्या आरोपावर म्हटले आहे.

सालोशी (ता महाबळेश्वर) येथे वळवी वस्ती असून, याठिकाणी सहा घरे आहेत. विद्युत ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील दोन-तीन गावांतील लोकांना विहिरीवरून पाणी आणण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. ती गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. मी आणि ग्रामस्थ आमदार मकरंद पाटील यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेलो होतो. त्यानुसार त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे शिफारस केली होती.- विठ्ठल मोरे, उपसरपंच, सालोशी.ता महाबळेश्वर.

Story img Loader