सांगली : तुमची प्रज्ञा, ताकद, वैचारिकता यावर तुमचे मोठेपण अवलंबून आहे. आपला वकुब आपली पात्रता ठरवतो. मला आजवर कुणी जात विचारली नाही. संतांनी ब्राह्मणांची मिरासदारी मोडून काढली. आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ. काम करताना आपला चेहरा महत्त्वाचा नसतो, आपण काय करतो हे महत्त्वाचे. मेंदूत ताकद हवी, विचारधारा महत्त्वाची असते असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.
इस्लामपूर येथे आयबीएफच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक प्रदर्शनाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रतीक पाटील, आयबीएफचे अध्यक्ष विकास राजमाने उपस्थित होते.
यावेळी पाटेकर म्हणाले, जयंत पाटील यांनी नियतीने लादलेले राजकारण यशस्वी करून दाखवले आहे. कोणाला त्रास न देता आनंद मिळवणे हे छान आहे. ‘नाम’ फाउंडेशनमध्ये अनेकजण सोबत येत आहेत. यावेळी एक हजार गावांमध्ये काम सुरू करत आहोत. पूर्वी दुष्काळी भाग असणारे गाव यावेळी बागायती घोषित झाल्याचा आनंद होतोय. खरं बोललं की लक्षात ठेवावं लागत नाही मात्र, खरं बोलण्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवायची.
याप्रसंगी राजवर्धनभैया पाटील, शामराव पाटील, विश्वतेज देशमुख, आर.डी. सावंत,धैर्यशील पाटील,चिमनभाऊ डांगे, विजयराव पाटील,विजयराव यादव,सुस्मिता जाधव रोझा किणीकर, विश्वनाथ डांगे, आर.डी.माहुली, अतुल पाटील, कार्तिक पाटील,पुष्पलता खरात,संग्राम जाधव,सुहास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.