Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना एक हजार रुपये दिले जातात. तर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक सक्षम नसलेल्या पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. अनेक महिला या दोन्ही योजनेत पात्र असल्याने दोन्ही योजनांचा लाभ घेतला जातोय. परिणामी दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये न मिळता ५०० रुपयेच मिळणार आहेत. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेतील सामायिक पात्र असलेल्या त्या आठ लाख महिलांनी नाराजी व्यक्त केली. तसंच, विरोधकांनीही यावर टीका केली. आता या चर्चा सुरू असतानाच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटलंय की, “दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.”
“त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७ लाख ७४ हजार १४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे”, असं स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी दिलं.
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी… pic.twitter.com/485UFXrRiq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) April 15, 2025
शासन निर्णयात कोणताही बदल झालेला नाही
“एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.