दापोली : आपले हिंदुत्व स्पष्ट आहे, आपल्या हिंदुत्वात हृदयात राम व हाताला काम आहे. मात्र विरोधकांचे हिंदुत्व इतरांचे घर जाळणारे असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आयोजित दापोली येथे प्रचार दौऱ्यात केला आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आज येथे ६० टक्के महिलांची उपस्थिती आहे ते कौतुकास्पद आहे. येथील गद्दार, चिंधीचोर यांना घाबरण्याचे काम नाही. आपण येथील जनतेला, मतदारांना हिम्मत द्यायला आलेलो आहोत. येथील मतदारांवर जनतेवर जर कोणी हात उचलला तर आपले सरकार आल्यावर त्यांना आपण बर्फाच्या लादीवर झोपवू असा इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात. ४० आमदार सोडून गेल्यानंतर देखील त्यांनी आता लढायचे आहे असा संदेश आपल्याला दिल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे मनात आणलं असतं तर आपल्या पदाला चिकटून राहिले असते. मात्र त्यांनी पद गेल्याची दुःख केले नाही. मात्र महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर गुजरातला गेल्यावर त्यांना अतोनात दुःख झाले. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात आली. येथील उद्योगपती देखील उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीपदाला प्राधान्य देतात. कारण उद्धव ठाकरे मंत्री असताना राज्य स्थिरता असते असे येथील उद्योगपतींचे मत आहे. यामुळे उद्योगपतींना देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे हवे आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतःचा विचार न करता प्रथम राज्याचा विचार करतात. सध्या राज्यात रोजगार निर्मिती बंद झालेली आहे. आहेत ते उद्योग व रोजगार गुजरातला पळवले जात आहेत. येथील तरुणांच्या कपाळावर जात धर्म लिहिलेली असत नाही. येथील तरुणांना काम हवे असते. आपले सरकार सत्तेवर आल्यावर येथील तरुणांना चार हजार रुपये रोजगार भत्ता, मुलांना मुलींप्रमाणे मोफत शिक्षण, लाडक्या बहिणींना दरमहा ३ हजार रुपये व सहा सिलेंडर, मोफत एसटीचा प्रवास, तसेच सर्वांकरिता २५ लाखाची कॅशलेस ट्रीटमेंट देखील देणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच शेतकऱ्यांकरिता ३ लाखापर्यंत कर्जमुक्ती, जातनिहाय जनगणना करणार असल्याचे सांगून आरक्षण मर्यादा वाढवणार असल्याचे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचा – “धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी

तसेच शिंदे सरकारने समाजात जातीय तेढ निर्माण केली. शिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला आहे. मालवण येथील शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळला. घटनाबाह्य सरकार बसवून संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे, असा घणाघात देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. आपण येथे बदला घेण्यासाठी नाही तर बदलाव करण्यासाठी आलेलो आहोत असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप व संघ कार्यकर्त्यांना दोन वर्षात तुम्हाला काय मिळाले असा प्रश्न विचारला. सध्या मंत्रिमंडळात असलेले १० मंत्री हे शिवसेनेतून फुटून आलेले आहेत. ९ मंत्री राष्ट्रवादीतून फुटून आलेले आहेत. भाजपच्या असणाऱ्या दहा मंत्र्यांपैकी केवळ सहा मंत्री हे मूळ भाजपचे आहेत. चार जण बाहेरून आलेले आहेत. ज्यांच्या विरोधात भाजप व संघाचे कार्यकर्ते कायमचे लढले, केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगात गेले त्यांच्याच पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पालकमंत्री म्हणून बसवण्यात आले. दोन वर्षांमध्ये महामंडळे, मंदिरांचे न्यास यावर फुटीरगटाचे प्राबल्य आहे. यामुळे या दोन अडीच वर्षात भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना नेमके काय मिळाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही आपली लढाई आमदार होण्यासाठी नाही तर राज्य वाचवण्यासाठी आहे. योगी आदित्यनाथ व अमित शहा हे बाहेरून येऊन गुजरात व यूपीचे मॉडेल दाखवतात. मात्र कोविडच्या काळात गंगेमध्ये वाहिली तशी महाराष्ट्रात प्रेते वाहिली नाहीत व गुजरातमध्ये ज्याप्रमाणे ऑक्सिजनला रांगा लावाव्या लागल्या तशा महाराष्ट्रात लावाव्या लागल्या नाहीत कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्र धर्माला जागून जात-पात न पाहता सर्वांचे जीव वाचवले आहेत.

हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या

राज्य अदानींना फुकटात न देण्यासाठी, कोकण अदानींना आंदण न देण्यासाठी, याविरुद्ध बंड करावा लागेल. गद्दारी विरुद्ध परिवर्तन आणावे लागेल. राज्याचा विकास करावा लागेल. पाच लाख रोजगार गुजरातला गेलेला परत आणावा लागेल. जे उद्योग धंदे गुजरातला गेलेले आहेत ते परत आणावे लागतील. गद्दारीला गाडावे लागेल. राज्याला लुटणाऱ्यांना हद्दपार करावे लागेल. याकरिता मशाल पर्याय निवडा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय कदम, डॉ. चंद्रकांत मोकल, सचिन कदम, आ. भास्कर जाधव, अमोल कीर्तिकर, सदानंद कदम, सायली कदम, माधव शेटे, मुजीब रूमाणे, खालीद रखांगे, विक्रांत जाधव, ऋषिकेश गुजर, शंकर कांगणे, सचिन तोडणकर, भाऊ मोहिते, डॉ. उमेश पवार, अंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नेते उपस्थित होते

Story img Loader